आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात. हे एकेक हाताच्या पंजाएवढे कोळी, कमावलेल्या शरीराची चिलटं, फावल्या वेळेत मारण्यासाठी रंगीबेरंगी माशा असे अनेक स्वघोषित रूममेट्स माझ्या घरी जाऊन येऊन असतात. देवाने पंख दिलेत म्हणून उगाच ते माझ्या कानाशी येऊन फडफडवण्यात त्या माशांना, जाळं विणता येतं म्हणून उगाच कानाकोप-यांत जाळी विणण्यात त्या कोळ्यांना, आणि रात्री सहा ढेंगा वर करून निवांत झोपायचं सोडून उगाच गगनभरा-या मारण्यात झुरळांना काय सुख मिळतं कोणास ठाऊक. पण ह्यांची आणि आमची शाळाकॉलेजपासूनची ओळख म्हणून खपवून घेते झालं! त्यामुळेच तर घरात सापडलेल्या पहिल्यावहिल्या मुकादेला मी निरागसपणे बाहेर टाकून जीवदान दिलं.
आता “मुकादे म्हंजे रे काय भाऊ?” यासारखे प्रश्न तुम्हाला पडणं किंवा दे च्या आधी मनातल्या मनात स्पेस द्यावंसं वाटणं सहाजिक आहे. प्रकरण ’चावट’ असले तरी रोमॅंटिक वगैरे अजिबात नाही. मुकादे हा शब्द जपानी चित्रलिपीत 百足असा लिहितात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे ’शंभर’ आणि ’पाय’ असा होतो. ह्याचाच अर्थ मुकादे हा २० किंवा त्याहून अधिक पाय आणि दोन खतरनाक नांग्या असलेला काळाकुट्ट, तुरुतुरु पळणारा सेंटिपीड जातीचा किडा आहे. मराठीत मुक्याच्या देण्याघेण्याने मनात गुदगुल्या होत असल्या तरी मुकादेने मुका घेतला तर सूज, उलटया, अंग काळेनिळे पडून बधीरपणा येणे, जळजळ हे सर्व होतं. (अनुभव नसल्याने फार वर्णन करता येणार नाही!) पण माणूस मरत नाही हे नशीब. “मुकामुका होतंय” म्हणजे जपानीत “कसंतरी होतंय” त्यामुळे पठ्ठा जपानीत आपल्या नावाला जागून आहे. मुकामार मधला ’मुका’ म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. त्याचा उगम बहुदा ह्या जपानी ’मुकामुका’ मध्ये असावा! असंही ऐकलंय की मुकादे नेहमी जोडीने फिरतात. त्यामुळे एक सापडला की दुसरा कुठेतरी निवांत प्लानिंग करत असेल हे सांगता येत नाही. मी जिथे रहाते तिथे औषधालाही माणूस सापडत नाही त्यामुळे जिवंत माणूस दिसला की माझ्यासारखाच मुकादेलाही आनंद होत असावा. आता आनंद व्यक्त करण्याची काहींची पद्धत असते चावरी! त्याला ते बिचारे काय करणार? असाही एक सहानुभूतीपूर्ण विचार माझ्या मनात येतो.
साधारण जूनच्या सुमारास जपानात ’त्सुयू’ म्हणजे ’मान्सून’ सुरु झाला की मुकादे फॉर्मात येतात. बाथटब, छान घडी करून ठेवलेले कपडे, चपला, उशा, गाद्या ह्या मुकादेच्या आवडत्या जागा आहेत. जपानी लोक साधारण मुकादे आला की त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून वरून दगड / काठीने बडवतात, गरम तेलात / पाण्यात टाकतात, किंवा मुकादेसाठीचा फवारा मारतात. पहिला साकुरा ही जशी जपान्यांसाठी बातमी असते तशीच पहिला मुकादे ही माझ्यासाठी. म्हणजेच कोणीही क्षयझने “आज मी घरात मुकादे पाहिला” असं म्हटलं रे म्हटलं की त्यादिवशीपासून लगेच मी चपला, गाद्या, उशा, कपडे वगैरे काहीही आधी झटकून मगच वापरते.
अगदी पहिल्या वर्षी “तुला इथे येऊन एक वर्ष झालं तरी मुकादे नाही दिसला?? घाबरला वाटतं तुला!” अशी खूप टिंगल झाली. पण सवयीनुसार तीही मी झटकली.
आणि एक दिवस नेहमीसारखी़च घाईत शाळेत जायला निघाले होते. मोजे घालून बूट घालायला उचलला तर खाली एक आठ इंची मुकादे माझी वाट बघत वळवळत होता. हसावं की रडावं तेच कळेना. मुकादेचा स्प्रे, गरम पाणी, तेल, बत्ता, मुसळ, वरवंटा असं काहीही जवळ नसतानाच्या निःशस्त्र अवस्थेत मुकादेशी वीसेक हात करणे भाग होतं. (अवांतर: बुटाने मुकादे मरत नाही.) मराठमोळं रक्त उफाळून आलं आणि त्याच तिरमिरीत त्याला चिमटयात पकडलं, सरळ गॅसवर धरलं आणि खालून गॅस पेटवून त्याचा एनकाउंटर केला. आणि त्यानंतर मिरच्यांची धुरी, एस. टी श्टॅंडावरील स्वच्छतागृहे, शाळेतली प्रयोगशाळा, २५ वर्ष सलग न धुता वापरलेले मोजे, जळका टायर ह्या सगळ्या वासाचं मिश्रण असलेला एक अवर्णनीय वास घरभर भरून गेला. तो वास एका स्प्रे वगैरे मधे भरून घेता आला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे माझे बॉस, वायफळ गोष्टींचा रिपोर्ट लिहायला लावणारे सुपर्वायझर, मी केलेल्या मसालेभातावर (“केवढा तिखट आहे!” असं म्हणत) यथेच्छ ताव मारणारे काही जपानी माझ्या दिशेने कूच करताना पाहून मी स्कंकसारखा ह्या स्प्रेचा वापर नक्की केला असता.
आत्तापर्यंत सापडलेल्या मुकादेची संख्या सम असल्याने सध्या मी निवांत आहे. लहानपणापासून जून म्हटला की नव्याकोर्‍या पुस्तकांचा, ओल्या मातीचा, आंब्याफणसाचा असल्या वासांची नाकाला सवय होती. आता मात्र त्यात काही नव्या वासांची भर पडली आहे.
मी मुकादे आला होता वगैरे सांगितल्यावर माझ्या काही हितचिंतक मित्रमैत्रिणींनी “काहीतरी शेंडया लावू नकोस. आता पुन्हा मुकादे आला नां की त्याचा एक फोटो काढून पाठव.” असे उत्साहवर्धक उद्गार काढल्यामुळे त्यांच्यासाठी हे पुराव्याने शाबीत! मुकादेचे अधिक रोमांचकारी छायाचित्रे व किस्से पाहाण्यासाठी यू-टयूब आहेच.


इतरांच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी कोणीतरी बाई येतात. कालपरत्वे प्रमोशन मिळून त्यांच्या (वयानुसार) ताई, मावशी, काकू किंवा आत्या होतात. पण भारती आमच्या घरी आली तीच भारती म्हणून आणि घरातलीच एक होण्यासाठी तिला कधीच मावशी आणि काकूसारख्या उपपदांची गरज पडली नाही. उलट तिच्या येण्याने माझ्या आईचीच “बाबूची आई” अशी एक नवीन ओळख तयार झाली.
उंच काटक बांधा, रेखीव चेहरा पण बसलेली गालफडं, सततच्या पानतंबाखूने रंगलेले ऒठ, कनवटीला खोचलेला बटवा आणि त्यात खुळखुळणा-या कात आणि चुन्याच्या छोट्या डब्या, चापूनचोपून नेसलेली धुवट नववारी साडी आणि त्यातून क्वचित डोकावणारं खपाटीला गेलेलं पोट. मी जवळजवळ २५ वर्षापूर्वी पाहिलेली भारती ही अशी होती आणि आजही ती अशीच असेल अशी मला खात्री आहे.
भारतीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. ते मला लक्षात रहायचं कारण म्हणजे मंगळसूत्राला चांदीच्या वाटया मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिल्या. पण भारतीची विचारपूस करताना कळलं की पदरात दोन मुलं ठेवून भारतीचा नवरा जो मुंबईला आला तो ह्या प्रचंड मायानगरीत पुरता रमला. आजतगायत तो जिवंत आहे किंवा नाही हेदेखील भारतीला ठाऊक नाही. तो परागंदा झाल्यावर मुलांना गावीच ठेवून पैशाच्या (आणि कुंकवाच्या?) शोधात ती मुंबईत आली. पण आजही त्याच्या आठवणींइतकंच काळं पडलेलं ते मंगळसूत्र मात्र तिने जपून ठेवलं आहे.
भूतकाळात जरी भारतीला वाईट अनुभव आले असले तरी त्याचे सावट तिच्या कामावर कधीच पडले नाही. माझी आज्जी स्वच्छ्तेच्या बाबतीत भयंकर काटेकोर होती. मोलकरणीने घासलेली भांडी ती पुन्हा विसळल्याखेरीज वापरत नसे. आधीच्या मोलकरणींच्या ते पथ्यावरच पडायचं. पण आपण घासलेली भांडी आज्जी पुन्हा विसळून घेते ह्यात कुठेतरी आपण तर कमी पडत नाही नां असं वाटून तिने स्वत:च ती दुस-यांदा विसळायला सुरुवात केली.
माझ्या जन्माच्या आधीपासूनच आमच्या घरी एक पितळी तपेलं होतं. प्यायचं पाणी त्या तपेल्यात उकळलं जायचं. माझ्या आज्जीचा त्या तपेल्याशी काहीतरी ‌ऋणानुबंध असावा किंवा कदाचित तिच्या तरुणपणीच्या आठवणी त्या तपेल्याशी जोडल्या गेल्या होत्या की काय कुणास ठाऊक पण ती त्या तपेल्याची सर्वतोपरी काळजी घेत असे. रोजच्या वापरामुळे ते काळं पडंत असे. की लागलीच आज्जी ते जातीने आधी आमसुलाने आणि नंतर पावडरने लख्ख धुवून काढत असे. आता पूर्वीचं जुने तपेलं ते! चांगलंच जाडजूड होतं. ते कमरेत वाकून धुवायचं म्हणजे चांगलंच दिव्य होतं. मोलकरणी तर दूरच पण घरच्या कुणीही ते धुतलेलं आज्जीला पसंत पडत नसे. आजी म्हातारी होत होती पण तपेल्याची सेवा करण्यात काही खंड नव्हता. एक दिवस भारती आली आणि तिला काय वाटलं कोण जाणे. काहीही न बोलता तिने ते तपेलं घेतलं आणि चक्क करून पुन्हा जागेवर ठेवून दिलं. आज्जीही तेव्हा काहीच बोलली नाही पण त्या दिवसापासून तपेलं काळवंडलं की ते घासायच्या भांडयांबरोबर ठेवलं जायला लागलं. तपेल्याची जबाबदारी जशी भारतीच्या पदरात पडली तसाच आज्जीचा विश्वासही…
भारती मुंबईत तिच्या आत्त्याकडे रहायला आली. पहिल्यापहिल्यांदा आत्याच्या ओळखीनेच तिला कामे मिळत गेली. पण मग आत्याबाईंचे कुटंब जसजसे विस्तारत गेले तसतशी तिथे भारतीची अडचण व्हायला लागली. स्वत:ची जागा शोधणे जितके अपरिहार्य तितकेच अशक्य होते. पैशाची मदत करणारे आमच्यासारखे बरेच लोक होते. पण खरी मदत केली ती बाग कुटंबियांनी. बरीच वर्षे ती त्यांच्या घरीच रहायला होती. त्यामुळे एकवेळ दुस-या कुणीही लवकर किंवा उशीरा बोलावले तर भारतीने नकार दिला असता पण बागवहिनींचा शब्द तिने कधीही खाली पडू दिला नाही. हां आता त्या बागवहिनींचेही पाय मातीचेच त्यामुळे त्याही तिला कधी वेडंवाकडं बोलल्या नसतीलंच असं नाही. त्यामुळे ती तक्रारही करायची पण लगेच दिलजमाईही होत असे. एकदा माझ्या आईने मोदक केले होते. आमच्या घरी कुठ्लाही नवीन पदार्थ केला की तो भारतीसाठीही राखून ठेवला जात असे. तसेच चार मोदकही भारतीला आणि तिच्या मुलांना दिले. दुस-या दिवशी आईने भारतीला विचारलं,” काय मग जमले होते का मला मोदक?”
तर भारती हसत म्हणाली,” अगं बाबूची आई, मी खाल्लेच नाहीत.”
“का गं? चार होते नां?” पुन्हा आई.
“अगं दोन मुलांना दिले आणि दोन शोनाच्या आईला (सौ. बाग) आवडतात म्हणून तिला दिले.”
तेव्हापासून आई मोदक केले की तिच्याचबरोबर ते बागांकडे पाठवे. देताना थट्टेने म्हणे “दोन मुलांना, दोन तुला आणि दोन तुझ्या लाडक्या शेठाणीला!”
भारतीच्या ह्या वागण्याला बरेच लोक तिची मोठेपणाची हौस म्हणून हिणवतही असतील. आणि ब-याचवेळा ती स्वत:ला तोशीस पोचवून तसं करतंही असे. माझ्या भावाच्या मुंजीत तिने घातलेलं ५०१ रुपयांचे पाकीट काय किंवा आजीने तिला दिलेला स्वेटर तिने गावी आईसाठी पाठवून देणं काय ह्या सगळ्याबद्दल ती माझ्या आईची बोलणीही खात असे. ब-याचदा पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण मिरवण्याचा मोह भल्याभल्यांनाही आवरत नाही. मग ह्यापैकी काहीच नसलेल्या तिने आपल्याकडची मनाची श्रीमंती मिरवली तर त्यात काय चूक?
ती फटकळ आहे असंही ब-याच जणांचं मत होतं. मला वाटतं फाटक्या खिशाचा फाटक्या तोंडाशी जवळचा संबंध असावा. ती आदर्श होती असा दावा मी करणार नाही. पण तिच्यातले दोष झाकण्याएवढे गुण नक्कीच तिच्यात होते. पण त्याचबरोबर समस्त मोलकरीण जमातीचे काही गुणविशेषही होते. कधीकधी भिंतीचे कान बनून ती घरोघरीच्या नाना परी आमच्यापर्यंत पोचवत असे, केर काढायला आल्यावर पसारा पडलेला असेल तर भरधाव तोंड सोड्त असे. माझं वजन वाढून मी बेढब झाल्यामुळे मला जीन्स कशी शोभत नाही हे ती जसं सहजपणे सांगे तितक्याच निरागसपणे “बाबूच्या घरचा रांगोळीचा स्टिकर वर्षभर टिकून आहे. कारण ह्या घरची माणसं पुण्यवान आहेत” हेही तीच सांगू जाणे. चांगलं बोललं की तो निरागसपणा आणि टीका केली की फटकळपणा हा दुटप्पीपणा नाही का?
आज भारतीची पूर्वीसारखी रोज भेट होत नाही. आजही ती आपल्या गळक्या घरात रहात असेल की मुंबई सोडून गावाकडे परत गेली असेल??? माझ्यासारखीच दुपारचा चहा पिताना किंवा पिझ्झा खाताना तिला तिच्या बाबूच्या घराची आठवण येत असेल का???
जपानात कुणाला मोलकरीण ही संकल्पनाच माहीत नाही. त्यामुळे भारतीचे आमच्या घराशी जुळलेले ऋणानुबंधही इथल्या लोकांना कळणार नाहीत. आणि कळत नाहीत हेच बरं कारण सांगायचं म्हटलं तरी मला ते कुठच्याच भाषेत सांगता येणार नाहीत.

;;