धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात. दूरवर बघावं तर झाडं, घरं, डोंगर, गाडया एक आकार बनून कधीच त्या बर्फात विलीन झालेले असतात. डिसेंबरला जुनं वर्ष पूर्ण करून आपल्या घराकडे परत जाण्याची इतकी घाई असते म्हणूनच की काय दिवसही आपसूक लहान होतात. घरापासून दूर असलेल्या प्रत्येक जपानी माणसाला ह्यावेळी त्या डिसेंबरसारखीच आपापल्या घराची ओढ लागलेली असते. नवीन वर्षाच्या उंबरठय़ावर जपानी घरं मुलाबाळांनी, भावाबहिणींनी, दीरजावांनी भरून जातात. ऋतुचक्राबरोबरच कुटुंबाचं चक्रही संपूर्ण होतं. डिसेंबर महिना जाता जाता हवेत गारठा आणि घरात ऊब मागे ठेवून जातो.

नवीन वर्षाचा आनंद खरंतर जगभरात साजरा केला जातो. पण जपानमधे मात्र त्याला वर्षानुवर्षाच्या परंपरांचं कोंदण आहे. जपानीत नवीन वर्षाच्या सोहळ्याला “ओशोगात्सु” (お正月) असं म्हणतात. आपली दिवाळी जशी अनेकविध धर्मांच्या भारतीयांना एकत्र आणते, तसंच ओशोगात्सुचा सणही शिंतो आणि बौद्ध ह्या जपानमधील दोन धर्मांतील परंपरांचा सुंदर मिलाफ घडवून आणतो. जपानी माणूस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बौद्ध देवळात घुमणा-या पितळी घंटेचे १०८ टोले (जोयानो काने) ऐकण्यासाठी जेवढा आतूर होतो तेवढयाच श्रद्धेने नवीन वर्षाच्या पहाटेला जिंजात जाऊन शिंतो देवदेवतांपुढेही नतमस्तक होतो (“हात्सुमोदे”). इतर वेळेस यंत्रवत काम करणा-या जपानी माणसाचं घरगुती, लेकुरवाळं रूप ओशोगात्सुच्या निमित्ताने पहायला मिळतं.
त्यामुळेच ओशोगात्सुचे सोहळे पाहिले की मला घरच्या दिवाळीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
दस-याला घटांची पाठवणी झाली की माळ्यांवरच्या लांब झाडूंना, कंदिलांच्या सांगाडयांना, चकलीच्या सो-यांना, रांगोळीच्या रंगांना, ठिपक्याच्या कागदांना आलेली जाग...
फराळांच्या वासांतून, डुलक्या घेणा-या शांततेत मधेच टचकन उडणा-या टिकल्यांतून, खरेदीच्या पिशव्यांतून ओसंडून वाहणारी दिवाळी...
नरकचतुर्दशीच्या पहाटे फटाक्यांच्या धुमधडाक्यात ऐकलेलं रेडिओवरचं कीर्तन, कंदिलाच्या हेलकावणा-या प्रकाशात चमकणारे रांगोळीतले रंग, रांगोळीत पणत्या ठेवणारी आई आणि पणतीच्या मिणमिण प्रकाशातही लख्ख उजळणारं तिच्या तोंडावरचं हास्य.
नरकचतुर्दशीच्या दिवशी आई कारीट फोडायला द्यायची. पुढे कळलं की कारीट हे नरकासुराचं प्रतीक आहे. नरकासुरासारख्या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट झाल्याचा आनंद म्हणून दिवाळी साजरी करायची. अर्थ कळला न कळला तरीदेखील आमचा आनंद मात्र त्या कारीटावर पाय देऊन गचकन त्यातून बाहेर सांडणा-या बिया पहाण्यातच असे.

मला आठवतंय दिवाळीत काकाच्या, मामाच्या, आत्याच्या घरून, झालंच तर शेजार पाजारूनही आवर्जून फराळाच्या पिशव्या घरी येत. मग आई त्या सगळ्या पुडया उघडून त्यातल्या चकल्या, शेव, कडबोळी, करंज्या वगैरे घरच्या फराळात मिसळून टाकत असे. चकली शेवेच्या विविध पिवळ्या छटा, कातलेल्या / दुमडीच्या करंज्यांच्या ओल्यासुक्या सारणांच्या विविध चवी, घरोघरच्या तेलातुपाचे खमंग वास सारे एकाच डब्यांत मोठया गुण्यागोविंदाने नांदत असत. देवदिवाळी झाली तरी फराळ संपता संपत नसे. प्रत्यक्षात अव्यक्त असलेल्या सगळ्या भावना अशा देवाणघेवाणीतून व्यक्त होत. ऐन दिवाळीतले फराळाचे डबे म्हणजे फक्त फराळाचीच नव्हेत तर ह्या सद्भावनांचीच अक्षयपात्रे होते.
जपानात नववर्षाला भेटवस्तू नाही तर भेटकार्डे पाठवण्याची पद्धत आहे. पोस्टऑफिसेससाठी वर्षाअखेरीचा हा काळ अतिशय धावपळीचा असतो. नोव्हेंबरपासूनच सगळ्या पोस्टांमध्ये खास भेटकार्डांसाठी वेगळी पेटी ठेवली जाते. २५ डिसेंबरपर्य़ंत पोस्टात पडलेली सर्व भेटकार्डे बरोब्बर एक जानेवारीला जपानभर घरोघरी पोचवली जातात. अगदी सामान्यातला सामान्य जपानीसुद्धा जर दरवर्षी जवळजवळ ५०-६० भेटकार्डे पाठवतो. त्यावरून पोस्टाच्या कामाची आणि तत्परतेची कल्पना यावी. भेटकार्ड पाठवतानाही नुसताच छापील मजकूर नाव घालून पाठवायचा असं नाही. तर को-या कार्डांवर आपले, मुलाबाळांचे, घराचे, अगदी घरी हौसेने पाळलेल्या कुत्र्या-मांजरांचेदेखील फोटो छापून, प्रत्येक कार्ड ज्याला पाठवायचं त्याची आठवण काढत, त्याच्या सहवासात घालवलेल्या क्षणांची उजळणी करत मोठया निगुतीने लिहिलं जातं. वर्षाच्या पहिल्या दिवशी आप्तेष्टमित्रांकडून आलेली असंख्य भेटकार्ड पहातानाचा आनंद खरंच त्या मिचमिच डोळ्यांत मावत नाही. फरक असला तर तो एवढाच की आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो, तर इथले लोक आठवणींची!
कुठलाही सण खाण्याशिवाय अपूर्ण राहतो. जपानी ओशोगात्सुचं खाणं आणि पिणं म्हणजे “ओसेची” आणि “ओतोसो”. नवीन वर्षी देवही (तोशीगामी)घरी जेवायला येतात असं जपानी लोक मानतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी दारावर “शिमेनावा” बांधतात. दारासमोर “कादोमात्सु” ठेवतात. ओसेची खायलाही खास चॉपस्टिक्स वापरतात. त्यांना “इवाई बाशी” असं म्हणतात. नेहमीच्या चॉपस्टिक्सची खायची बाजू निमुळती आणि धरायची बाजू थोडी जाड असते; इवाई बाशीच्या दोन्हीही बाजू निमुळत्या असतात. म्हणजे एका बाजूने आपण जेवत असतानाच त्याच चॉपस्टिक्सने आपल्याबरोबर देवही जेवत असतात! बहुतेक देवाच्या अथांग आकाशातही भरल्या घरातल्या अगत्याची, प्रेमाची, लटक्या रागाची ऊब नसावी. त्यासाठी त्यालाही असं इथे मातीतच उतरून यावं लागतं!


इतर कुठल्याही जपानी जेवणाप्रमाणेच ओसेचीही रंगीबेरंगी असते. लाखेची नाजूक सोनेरी कलाकुसर केलेल्या लाकडी जुबाकोच्या काळसर तपकिरी रंगावर भाज्यांचं ताजे रंग अधिकच उठून दिसतात. नवीन वर्षाचा सण एक जानेवारीपासून थेट सहा जानेवारीपर्य़ंत चालतो. पूर्वी ह्या संपूर्ण आठवडयात जपानी घरात चूल पेटत नसे. त्यामुळे पारंपारिक ओसेची ही अगदी भात, भाज्या, लोणची, कोशिंबीरी अशी डाव्या उजव्या बाजूंनी परिपूर्ण असते. नवीन वर्ष धनधान्याचं, समृद्धीचं, दीर्घयुष्याचं जावं म्हणून ओशोगात्सु साजरा करायचा. म्हणून मग ओसेचीत कुठले पदार्थ वापरावेत ह्याचे फार मजेशीर जपानी संकेत आहेत. ते कधी त्यांच्या दिसण्यावरून पडतात; कधी नावांवरून. उदाहरणार्थ एबि (海老) म्हणजे आपली कोळंबी. चित्रलिपी पाहिली तर कोळंबी म्हणजे चक्क “समुद्रातले आजोबा”. कारण कोळंबीच्या पाठीला बाक असतो. झालंच तर मिशा हे इथे बुद्धिमत्तेचं लक्षण मानतात. म्हणूनच कोळंबी खाल्ल्याने दीर्घायुष्य आणि विद्वत्ता लाभते असं मानतात. ताझुकुरी नावाचे छोटे मासे पूर्वी भाताच्या रोपांना खत म्हणून वापरले जात. म्हणूनच नवीन वर्षात शेतीची भरभराट होण्यासाठी ताझुकुरी खाण्याची पद्धत! अशा नितांतसुंदर साग्रसंगीत ओसेचीला नकळत डोळ्यांनीच चित्राहुती घातली जाते. घरच्यांच्या समाधानातून, हास्यविनोदातून नवीन वर्षात पुन्हा नव्याने कष्ट करण्याची उमेद येते. प्रथा भारतीय असो किंवा जपानी. हे सारं आपण आजही का करतो? “मी कोण आहे?” असा प्रश्न पडतो तेव्हातेव्हा अशा वरकरणी अनाकलनीय परंपराच आपल्याला आपण एखाद्या समृद्ध संस्कृतीचा अंश असल्याची आठवण करून देतात, पूर्वजांशी आपली नाळ अजूनही तितकीच घट्ट जोडलेली असल्याची सुखद जाणीव करून देतात. जसजसा काळाचा पट उलगडत जातो तसं जीवनमानही बदलत जातं. पण त्याचबरोबर शतकानुशतकांच्या परंपरांचं, विचारांचं संचितही एका पिढीकडून दुस-या पिढीकडे सोपवलं जातं. फुलांच्या ताटव्यातून स्वच्छंदपणे उडणा-या रंगीबेरंगी फुलपाखराचे नाजूक पंख धरायला जावं तर ते क्षणात दूर निसटून जातं. “संस्कृती म्हणजे काय?” ह्याचा शोध घेतानाही नेमकं असंच होतं. कारण तो अर्थ जाणीव नेणीवेच्या अधेमधे कुठेतरी दडलेला असतो. संस्कृतीचं हे फुलपाखरू कदाचित कुणीच पकडू शकणार नाही. पण त्याने आपल्या हातांवर मागे ठेवलेले प्रथांचे, रिवाजांचे रंग मात्र पुसू म्हटलं तरी कधीच पुसले जाणार नाहीत.

"कुठलाही पदार्थ जिवंत असता तर त्याने काय बरं सांगितलं असतं?" असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाची झलक येते. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या!

असं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी लागला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते पहिल्या महायुद्धाच्या वेळचं इटली. चारी दिशांत भरलेली युद्धाची धुमश्चक्री. युद्धावर जायला निघालेल्या एखाद्या अनाम सैनिकाचं घर. कितीही निरोप घेतला तरी कमीच अशी वेळ. एका डोळ्यात विरह आणि दुस-या डोळ्यात त्याच्याविषयीचा प्रचंड अभिमान बाळगून चेह-यावर मंद हास्याचा मुलामा देणारी त्याची ती. इतरांकडून मिळालेले निरोप, आशीर्वाद, प्रार्थनांच्या बरोबरीनेच त्याने जपून ठेवलेली आणखी एक वस्तू. तिने स्वत: केलेलं तिरामिसु! त्यात घातलेल्या चीज, केक, अंडं, लिकर ह्या सा-याच गोष्टी त्याला लढायला ताकद देतील आणि सुखरूप परत आणतील अशी तिची वेडी अपेक्षा! आणि मग नीरव एकांतात तो ते तिरामिसु खात असताना त्या निर्जीव केकच्या थराथरातून उलगडत जाणारा क्रीमचा नितळपणा...अगदी तिच्या नितळ त्वचेशी स्पर्धा करणारा, किंवा तोंडाभर पसरत जाणारा कॉफीचा किंवा लिकरचा हवाहवासा मादक कडवटपणा...अगदी थेट तिच्यासारखा, त्यातच विरघळलेली चीजची लुसलुशीत आंबट चव...ती सतत त्याच्या जवळ असल्याची आठवण करून देणारी! नेहमीच तिरामिसु खाताना हे सगळं प्रेम मला जाणवतं...आणि मग कॅलरी वगैरेचा विचार करायला वेळच मिळत नाही.
पारंपरिक इटालियन तिरामिसु करताना लिकर, केक, मास्कारपोनी (?) चीज आणि सॅवॉर्डी (?) बिस्किटं असं वापरतात. पण एका जपानी खानाखजानामधे मला मिळालेली तिरामिसु स्टाईल्च्या केकची ही फूल-प्रूफ़ रेसिपी...अर्थात ह्या रेसिपीतही मिपावरच्या संजीव कपूर/ तरला दलालांच्या चिमूटभर कल्पकतेची भर पडली तर खरं तिरामिसु होऊ शकेलही! :)

साहित्य
• २ चहाचे चमचे भरून कॉफी पावडर
• १०० मि.ली. दूध
• १२ मारी बिस्किटे
• २०० मि.ली. क्रीम
• ५० ग्रॅम बारीक साखर
• २ चहाचे चमचे व्हिनेगर (पुस्तकात तांदळाचं व्हिनेगर वापरा असं लिहिलेलं आहे. पण मी फ्रुट- व्हिनेगर वापरूनही करते)
• एका अंडयाचा बलक
• सजावटीसाठी थोडी कोको पावडर (साखर नसलेली)
• मारीची ६ बिस्किटं (३ x २) झोपतील असा एक डबा

कृती
• कॉफी पावडर दुधात विरघळवा.
• मारी बिस्किटं त्या दुधात बुडवून ठेवा. बिस्किटं अखंडच रहातील (त्यांचा लगदा होणार नाही) याची काळजी घ्या. बिस्किटं पुरेशी भिजली की बाजूला काढून ठेवा.
• एका बाऊलमधे क्रीम घेऊन त्यात साखर फेटून विरघळवून घ्या.
• मग व्हिनेगर घालून पुन्हा थोडेसे फेटा. व्हिनेगर घातल्याघातल्याच क्रीम घट्ट होत जाईल. जवळजवळ भज्यांच्या पिठापेक्षा किंचित जास्त घट्ट होईल.
• आता त्यात अंडयाचा बलक घालून पुन्हा नीट फेटून घ्या.
• आता डब्यात ती कॉफीत भिजवलेली सहा बिस्किटं ३ x २ अशी ठेवा. त्यावर त्या फेटलेल्या क्रीममधलं अर्धं ओता आणि सारखं पसरा. त्यावर पुन्हा उरलेली सहा बिस्किटं लावून उरलेलं क्रीम पसरून घ्या.
• वरती गाळण्यातून कोको पावडर भुरभुरवा आणि ८-१२ तास फ्रीजमधे थंड करत ठेवा.
• चांगलं घट्ट झालं की आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा तिची आठवण काढत खा.

सुगरणीचा सल्ला
• व्हिनेगरचं प्रमाण पुस्तकात जरी २ चमचे लिहिलं असलं तरी मी पहिल्यांदा केलेला केक मला जरा आंबट वाटला. म्हणून मी आता दीडच चमचा व्हिनेगर घालते. व्हिनेगरप्रमाणेच कॉफी पावडरचं प्रमाणही आवडीनिवडीप्रमाणे कमी-जास्त झालं तरी चालतं.
• पण क्रीममधे साखर, व्हिनेगर आणि अंडं घालायचा क्रम बदलला तर मात्र पुढे जे काही होईल त्याला केक म्हणता येणार नाही.

ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच. त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात. आणि मग एखाद्या गवयाने सुराला सूर जोडत गात जावं तसंच कधी आमटीचा भुरका, कधी लोणच्याचं बोट तर कधी स्निग्ध तुपाने सुस्नात मोदकाचा घास असं चवीला चव जोडत खवय्ये खात जातात. मोदकांवर पळ्यांनी आग्रह पड्तच जातो, रिकाम्या झालेल्या वाटया घरच्या अन्नपूर्णांच्या प्रेमाने भरतच जातात. हास्यविनोदात सामील झालेल्या बाप्पाचे डॊळेपण हसताना बारीक झालेले असतात. शेवटी कुणीतरी उठून बडिशेप, विडे आणतो आणि पानं हलतात. मघाच्या आरतीतल्या भक्तीरसाबरोबरच आता इतर अनेक रसांनी ती खोली तुडुंब भरून गेलेली असते!

मी जपानाला आले आणि ह्या ताटावरच्या मैफिलीत रंग भरले जाईनात. पण त्याच वेळेस माझ्या आजुबाजूची माणसं मात्र “उमाई” “ओइशिई” म्हणत त्या जेवणावर चॉपस्टिक्सने तुटून पडली होती. आणि मग एकदम लक्षात आलं. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला मनगटावर मारे गजरेबिजरे बांधून गेलं तरी लावणीचा ठसका मिळणार नाही; शास्त्राच्या पुस्तकात भटांची गजल असणार नाही. तसंच जपानी जेवणातही घरच्या चवी सापडणार नाहीत. असा “परि तू जागा चुकलासी”चा साक्षात्कार मला झाला तेव्हाच मी जपानी जेवणात ख-या अर्थाने रस घ्यायला लागले.

जपानी जेवण ही काही (नुसतीच) खायची गोष्ट नाही…ती तर लिहायही, बघायची गोष्ट आहे. जपानी भाषेत “आधी डोळ्यांनी खावं आणि मग हातांनी” (मे दे ताबेतेकारा, ते दे ताबेरु) अशा अर्थाची म्हणच आहे. एखाद्या मादक यौवनेने “drink to me only with thine eyes” म्हणावं आणि वारुणीशिवायच नशा यावी तसंच “eat to me only with thine eyes” असं म्हणणा-या जपानी जेवणाकडे बघूनच समाधान होतं. पसरट वाटीत तोफुचा (तोफु=सोयाबीनचं पनीर) पांढराशुभ्र चकचकीत ठोकळा, त्याच्यावर टेकवलेलं टिकलीएवढं हिरवं वासाबी (वासाबी=जपानी मोहरीची चटणी), वरून भुरभुरलेल्या पातीच्या कांद्याच्या हिरव्या भिंगो-या, आणि पांढ-याशुभ्र तोफुवरून वहाणारे सोयासॉसचे तपकिरी ओघळ! बाजूला सुशीच्या रंगीबेरंगी गुंडाळ्या, एकीकडे तेनपुराच्या (तेनपुरा=जपानी भजी) आरस्पानी आवरणातून डोकावणारी गाजरं, वांगी, रताळी.भारताच्या शोधात निघालेला कोलंबस जसा अमेरिकेला जाऊन पोचला तसाच चवीच्या शोधात निघालेला खवय्या इथे नितांतसुंदर सौंदर्यापाशी येऊन पोचतो.





निसर्गाने जपानला भरभरून दिलंय. मग जपानी माणूसही निसर्गाला आपल्या घरचाच एक असल्यासारखा प्रेमाने वागवतो. घर कितीही लहान असलं तरी तिथे झाडांना, पानाफुलांना त्यांची अशी जागा असते. कधी घरापुढे अंगण असतं (त्याला “निवा” म्हणतात), तेव्हढीही जागा नसेल तर घराच्या दारात आल्यागेल्याचं स्वागत करायला ताजी रंगीत फुलं उभी असतात. तेही नसेल तर अगदी किमानपक्षी बाथरूमच्या कट्टयावरच्या एवढयाशा जागेत चिमुकल्या वाटीत, काचेच्या भांडयात फुलं, पानं, वेली असतातंच. जपानच्या एका वर्षात चार ऋतू आपापलं वैशिष्टय जपत मोठया गुण्यागोविंदाने नांदत असतात. ऋतू सरत जातात तसा बदल पहिल्यांदा हवेत होतो आणि मग तिथून थेट जेवणात उतरतो. त्या त्या ऋतूचं वैशिष्टय असलेल्या भाज्या, फळं हे सगळं जेवणात येतं. मला माझ्या शाळेतली मुलं कुतुहलाने विचारतात,” तुमच्या इंडियातल्या वांग्याची चव इथल्यासारखीच असते का?” आता वांगं म्हटल्यावर माझ्या जिभेवर येते ती भरल्या वांग्याची चव किंवा वांग्याच्या कापांची चव. पण दोन्ही मसालेदारच. त्यामुळे मला काहीही उत्तर देता येत नाही. जपानी जेवणात पदार्थाची मूळची नैसर्गिक चव मारून टाकायचा प्रयत्न नसतो. म्हणूनच मग भेंडीचा बुळबुळीतपणा, कारल्याचा कडवटपणा, कोबीचा करकरीतपणा, कच्च्या गाजराचा गोडवा हे सगळं जसं आहे तसं ताटात उतरतं. हे सगळं माझ्या जिभेला रुचलं नाही तरी त्यातली “जे जसं आहे ते तसं” स्वीकारायची भावना मात्र मला आवडते.

जपानी जेवणात सी-वीड (नोरी) वापरतात. माझे आईबाबा जपानला आले असताना योशिदासाननी खास माझ्या आईबाबांसाठी ताज्या सी-वीडचे हिरवे कागद मागवले होते. त्यावर भात पसरून, आत भाज्या घालून गुंडाळून खायचं होतं. (थोडक्यात नोरी फ्रॅंकी!) माझ्या आईने तो प्रकार तोंडात घालताक्षणीच,”ह्याला खारट पाण्याचा (पक्षी: माशाचा) वास येतो आहे!” असं मराठीत म्हटलं. इकडे योशिदासान जपानीत सांगत होत्या, “हे फार चांगल्या प्रतीचं सी-वीड आहे कारण ह्याला अजून समुद्राचा वास येतोय!” माझी चांगलीच पंचाईत झाली. त्यावेळी तिथली भाषेची दरी माझ्यातल्या दुभाष्याने भरून काढली असती तरी ही सांस्कृतिक दरी मात्र मी सोयिस्करपणे मौनानेच भरून काढली.

इथे आल्यावर मला “तुम्ही लोक हाताने का जेवता?” असं सगळेच एकदातरी विचारतात. त्यावर उत्तर म्हणून मी त्यांना “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म” समजावून सांगते. आपल्याच शरीरात वास करणा-या शक्तिरूपी ईश्वराला पोटाच्या यज्ञकुंडात दिलेली आहुती म्हणजे जेवण! पंचप्राण एकवटून केलेली शक्तीची प्रतिष्ठापना म्हणजे जेवण. आपल्या जेवणात असं पंचेंद्रियं जागवणारं सगळं काही असतं. मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटताना जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं. असं हे आपल्या “वदनीकवळ”चं पावित्र्यच मला वज्रासनात ताठ बसलेला जपानी, समोरचं बुटकं सोनेरी कलाकुसर केलेलं टेबल, त्यावर मांडलेले असंख्य चिमुकले वाडगे, ते अदबीने हाताच्या ओंजळीत उचलून एकेक घास शांतपणे तोंडात घालणा-या जपानी माणसात दिसतं. भले चवी वेगळ्या असतील पण आकाशातल्या ज्या अदृश्य शक्तीचा अंश आपण ग्रहण करीत आहोत त्याविषयी कृतज्ञतेची भावना मात्र “वदनीकवळ” म्हटलं काय किंवा “इतादाकिमास” म्हटलं काय सारखीच आहे असं मला वाटतं.

मागे एकदा असंच डिक्शनरीशी खेळ करताना मी “जपान” ह्या शब्दाचा अर्थ पाहिला होता. जसा चायना शब्दाला विशिष्ट अर्थ आहे (संदर्भ: bull in a China shop!) तसंच जपान म्हणजे लाकडी भांडी वॉर्निशने चमकवून त्यांवर लाखेने केलेलं सोनेरी नक्षीकाम. लाखेचेच नव्हेत पण चिनीमातीचे, भूमितीतल्या आणि भूमितीबाहेरच्या सगळ्या आकारांचे (मेपलच्या पानाचे, साकुराच्या पाकळीचे, चंद्रकोरीचे) सुंदर ताटल्या, वाटया, वाडगे इथे पाहिले. एवढंच नव्हे तर खोलगट बांबू, शिंपले, वेताच्या टोपल्या ह्यांचादेखील जेवण वाढण्यासाठी कलात्मकतेने वापर केलेला पाहिला. एकदा तर “सफरचंदाचं ग्लटन” नावाचा प्रकार तर चक्क लालचुटुक सफरचंद पोखरून त्यातच बनवलेला होता! आणि देठाचा भाग झाकण म्हणून ठेवला होता. तिथे “गाजराची पुंगी”सारखं “सफरचंदाची वाटी, आतलं संपलं तर ठीक नाहीतर मोडून खाल्ली!” हे मी किती वेळा मनात म्हटलं! समोर वाढलेलं ते सगळं सौंदर्य डोळ्यात आणि मग पोटात साठवून घेताना परत एकदा “उदरभरण नोहे...”तल्या उदात्ततेचीच अनुभूती आली.




जेवण (मग जपानी असू दे नाहीतर आपलं!) कुणालाही एवढं प्रिय का वाटावं? कारण जेवणातून मिळणारं समाधान नेहमीच चवीत नसतं. ते मनात असतं. जेवणाशी चित्र/ आठवणी जोडलेल्या असतात. आपण नुसतंच जेवत नसतो. तेव्हापुरत्या त्या सुखद आठवणी जगत असतो. हेच बघा नां...रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी. ह्या सगळ्यातून तेव्हापुरता का होईना धकाधकीपासून दूर गोव्याचा संथ समुद्रकिनारा, मऊशार वाळू, खा-या वा-यांवर सळसळणारे माड ह्या सगळ्याचा आभास निर्माण होतोच नां? जे आपल्याकडे तेच जपानात. इथे उन्हाळ्यात सोमेन नूडल्स खातात. बाहेर उन्हाची काहिली वाढलेली असते. तशातच पाण्याची किंवा उन्हाळ्यातल्या स्वच्छ आकाशाची निळाई सोमेनच्या बाऊलमधे उतरलेली असते, त्यात बर्फाचे खडे आणि त्यावर तरंगणा-या पारदर्शक सोमेन नूडल्स. मग त्या सोमेन सुर्रकन ओढून खाताना आतपर्यंत जाणवलेला बर्फाचा गारेगार स्पर्श...ऐन उन्हाळ्यात हिवाळ्याचा आभास होतो. A way to one’s heart goes through stomach किंवा A way to one’s stomach goes through heart दोन्हीही तितकंच खरं असतं. इथल्या जेवणाशीही माझ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक वेळी जेवताना त्यानीच जेवणाला चव येते.

आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा jet lag गृहित धरतोच नां! पहिले काही दिवस आपल्या आजुबाजूचं जग शांत झोपलेल असताना आपण जागे असतो. आणि त्यांची कामाची वेळ झाली की आपले डोळे मिटायला लागतात. पण म्हणून “मी माझ्या वेळेप्रमाणेच वागणार!” असा आडमुठेपणा न करता आपणच आपलं घड्याळ लावून घेतोच ना! माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतोच. त्यामुळे आता मी घड्याळाबरोबरच माझी जीभही इथल्या चवींशी लावून घेतली आहे. आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.

हे आणखी काही फोटो:







इसापाच्या गोष्टीत असतं तसं प्राण्यांचं एक आटपाट नगर होतं. तिथे अनेक प्रकारचे प्राणी अगदी गुण्यागोविंदाने रहात होते. प्रत्येक प्राण्याची आपली अशी वेगळी संस्कृती होती. “उतायचं नाही, मातायचं नाही आणि माणसांसारखं भांडायचं नाही” हे मुळी त्या नगराचं ब्रीदवाक्यच होतं. ह्या ब्रीदवाक्याला जागून होता होईल तेवढी सांस्कृतिक देवाणघेवाण करायची ह्यावर तिकडचे सगळेच नागरिक एकमत होते. ह्या नगरातल्या एका भागाचा हा क्रॉससेक्शन!
*****
ह्या वस्तीत तीन शेजारी रहात होते; कोल्हा, करकोचा आणि कावळा.
करकोचा दिसायला दौलदार आणि सडपातळ शरीरयष्टीचा होता. इतर पांढ-या प्राण्यांना जरी करकोच्याच्या पांढ-या रंगात पिवळसर झाक दिसली तरी स्वत: करकोच्याला मात्र तो स्वत: पांढराशुभ्र असल्याची खात्री होती. म्हणूनच दिवसातला त्याचा बराचसा वेळ आपले पंख चोचीने साफ करण्यात आणि बाकीचा वेळ घर साफ करण्यात जात असे. तसा तो फारच प्रेमळ आणि नम्र होता. एकटाच आपला पाण्यात तासनतास उभा राहून मासे पकडत असे. पण त्याला कोणी सामान्य पक्ष्यांच्या (विशेषतः कावळ्यांच्या) पंगतीला बसवले की त्याला ते मुळीच खपत नसे.
त्याचा शेजारी कोल्हा; तांबूस रंगाचा आणि झुपकेदार शेपटीचा. कोल्ह्याच्या घरावरचे गोल घुमट, घराची बांधणी ह्यावरूनच त्याच्या हुच्च राहणीचा कुणालाही अंदाज आला असता. कोल्ह्याच्या घरी अगदी पिढया दर पिढया जणु लक्ष्मी आणि सरस्वती जुळ्यानेच जन्माला येत होत्या. त्यामुळे अशा सर्वसंपन्न कोल्हासंस्कृतीत करकोच्याला विशेष रस होता.
तिसरं घर कावळ्याचं. कावळा दिसायला काळा पण अतिशय हुशार आणि मेहेनती होता. त्याच्या गबाळ्या घरावरून त्याच्या तल्लख बुद्धीची कल्पना कुणालाच आली नसती. म्हणा तसा कावळ्याला त्याने काही फरक पडणार नव्हता. कारण एक काडी जमवत जमवत त्याने बरीच पुंजी जमवली होती. वस्तीतल्या सगळ्यांनाच काकसंस्कृतीविषयी विलक्षण आकर्षण होतं. विशेषत: कावळ्यांचं जेवण जरी आजतागायत कोणी खाऊन पाहिलं नसलं तरी कावळ्यांची खाद्यसंस्कृती हा तिथल्या सांस्कृतिक चर्विच्चर्वणाचा विषय बनला होता.
*****
ह्याचाच फायदा घेऊन आपल्या शेजा-यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करावेत ह्या हेतूने कावळ्याने एकदा करकोच्याला आपल्या घरी मेजवानीचं आमंत्रण दिलं. आता करकोच्याची झाली पंचाईत! सांस्कृतिक आदानप्रदानाचा झेंडा अखंड फडकवत ठेवतानाच कावळ्याला नकार कसा द्यावा ह्याचा तो विचार करायला लागला.
पण फार विचार करायची गरज पडली नाही. कारण कोल्ह्यानेही अगदी त्याच दिवशी त्याच वेळी त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. निवड सोप्पी होती. लगेच कोल्ह्याकडे होकाराचे आणि कावळ्याकडे नकाराचे निरोप गेले. घेतला वसा टाकावा न लागल्यामुळे करकोच्याची मान एक इंचभर उंचावली.
आता कोल्ह्यासारख्या कला-साहित्य-शास्त्रसंपन्न घरात मोकळ्या हाती कसं जायचं म्हणून करकोच्याची तयारी सुरु झाली. मिसेस करकोच्यांनी अस्सल करकोची खाद्यपदार्थ जातीने तयार केले, बाळ करकोच्यांनी बाळ कोल्ह्यांसाठी आपल्या बाळहातांनी चित्रे काढली, भेटकार्डे तयार केली. अशाप्रकारे जय्यत तयारीनिशी करकोचा कोल्ह्याकडे रवाना झाला.
कोल्ह्याने दारातच करकोच्याची स्तुती आणि स्वागत केलं. करकोचाही त्यात मागे राहिला नाही. कोल्हासंस्कृतीविषयी त्याला वाटणारी तळमळ तो भेटींच्या स्वरूपात बरोबर घेऊन आलाच होता. ती त्याने कोल्ह्याकडे सुपूर्त केली. कोल्ह्याने कोणतेही आढेवेढे न घेता त्या सर्व भेटींचा सादर स्वीकार केला. आणि सगळे जेवणाच्या टेबलाकडे रवाना झाले.
त्या टेबलावर कोल्हासंस्कृतीतले अनेकोत्तम पदार्थ मांडले होते. झालंच तर पेले, वाट्या आणि ताटल्यादेखील कोल्हासंस्कृतीच्या उच्चपणाची ग्वाही देत होत्या. गालिचे, रुमाल टेबलक्लॉथ ह्यावर देखील कोल्हा संस्कृतीची छाप जाणवत होती. करकोच्याला ताटलीतल्या कोल्हासंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा होता. पण ताटलीच्या पसरट आकारामुळे तो आपली चोच ओली करण्यापलिकडे तो काहीही करू शकला नाही. अर्थात, तरीही त्या पदार्थांच्या न घेतलेल्या चवीची तारीफ करायला तो विसरला नाही.
शेवटी निरोपाची वेळ आली. करकोच्याकडून मिळालेल्या भेटीची परतफेड म्हणून कोल्ह्याने आपल्या संस्कृतीचा ठसा असलेल्या ताटल्या आणि वाडगे भेट दिले. अशाच सांस्कृतिक भेटी घडत राहिल्या पाहिजेत असा निर्धार करूनच करकोचा घरी परतला.
*****
आजकाल कावळा इतर प्राण्यांना कोल्हा आणि करकोच्यांच्या संस्कृतीवर भाषणे देत फिरत असतो. आणि घरी कावळ्याची मुलंबाळं (करकोच्याकडून मिळालेल्या) कोल्हासंस्कृतीय ताटवाटयातून (कोल्ह्याकडून मिळालेल्या) करकोचासंस्कृतीय पदार्थांचा आस्वाद घेत असतात. असं इतर प्राणी ऐकून आहेत.
*****
वरील गोष्ट हे रूपक आहे ही गोष्ट लक्षात आली असेलच. इथे कुठल्याही संस्कृतीवर दोषारोप करण्याचा उद्देश नाही. पण कुठल्याही संस्कृतीचे घटक असलेल्या मनुष्यस्वभावाची झलक दाखवण्याचा प्रयत्न मात्र आहे.
इथे जपानात मी इंग्रजी तर शिकवतेच पण त्याचबरोबर जपानी मुलांना माझ्या देशाची ओळख करून देणे हादेखील माझ्या कामाचाच एक भाग आहे. म्हणूनच माझे जपानी विद्यार्थी आणि त्यांच्याच वयाचे भारतीय विद्यार्थी यांच्यात पत्रमैत्री घडवून आणली तर? अशी एक कल्पना मी शाळेत मांडली. असा प्रकल्प आधी कुणी केला नसल्याने त्याला बजेट नाही. त्यामुळे पोस्टेजचा खर्च उचलण्याचीही मी तयारी दाखवली. पण माझ्या शाळेतल्या फक्त तीन मुलींनी प्रत्येकी पाच ओळींची पत्र लिहिण्याएवढाच उत्साह दाखवला. बरोबरच आहे म्हणा…आपण ज्यांना बाटल्यांची बुचं आणि पैसा पाठवतो अशा मुलांशी मैत्री करण्यात इथल्या मुलांना अजिबात रस नव्हता.
त्याच सुमारास इटालीच्या एका शाळेकडूनही अशीच ऑफर आली. आणि काय गम्मत! जादूची कांडी फिरवल्यासारखी अख्खी शाळा कामाला लागली. व्हिडिओ तयार केले, चित्रं काय काढली, पत्रं काय लिहिली (एवढी पत्र आली की शेवटी निवड करावी लागली! ती निवडक पत्र तपासून सुधारणा मीच करून दिल्या!) ते सगळं इटालीला पाठवून जपानी मुलं उत्तराच्या अपेक्षेत होती.
आणि उत्तर आलं. तिथल्या मुलांनी काढलेली काही चित्र आणि काही पत्र होती. सगळे विद्यार्थी शाळेच्या हॉलमधे जमा झाले आणि मुख्याध्यापकांनी मोठ्या अपेक्षेने एक पत्र उघडलं. आणि त्यांचा चेहराच पडला. ती सगळी पत्र चक्क इटालियन भाषेत लिहिलेली होती. जपानी मुलांना इटालियनमधून लिहिलेली पत्रे वाचता येणार नाहीत हा साधा विचारही कोणाच्या मनात येऊ नये ह्याचं मला प्रचंड आश्चर्य वाटले. ह्यापेक्षा आमच्या शाळेतल्या मुलांना पत्रे पाठवली असतीत तर त्याचे तुम्हाला कळेल अशा भाषेत नक्कीच उत्तर आले असते असे सांगावेसे वाटले पण सांगून काही उपयोग होईल असं वाटलं नाही म्हणून शांत बसले.
पण तरीही मी इटालीहून मिळालेल्या मिठाया खाल्ल्याच, झालंच तर त्या सगळ्या पत्रांचे आधी इंग्रजीत आणि नंतर जपानीत भाषांतरही केले आणि इथून इटालीला पाठवलेल्या सगळया व्हिडिओजच्या कॉप्या करून घेतल्या. न जाणो पुढेमागे जपानी शाळांवर बोलायची, लिहायची वेळ आलीच तर त्यांचा मला चांगलाच उपयोग होईल.

प्राजूची “प्रिय सौ. आईस” नावाची मिपावरची कविता वाचून सुचलेलं काहीतरी...एका आईचं मनोगत. ही मी केलेली पहिलीवहिली कविता (?) असल्याने चु.भु.द्या.घ्या. कल्पना फार पूर्वी वाचलेल्या इंग्रजी कवितेवरून सुचली असली तरी भावना आणि शब्द एकदम वोरिजिनल!

मला आजही आठवतंय माझं बाळ…
पाळणाघराच्या खिडकीत बसून
माझी वाट बघणारं…
धावत येऊन मला बिलगणारं…
माझ्या हातात असायच्या पिशव्या
भाजी, खाऊ, खेळणी, जबाबदा-यांनी गच्च भरलेल्या…
अगदी तळाशी असायचं दबलेलं माझं तुझ्यावरचं प्रेम…
रस्ताभर तुझी माझ्यातल्या आईशी बडबड आणि माझी माझ्यातल्या प्रोफेशनलशी!
“उद्या शाळेत नां”…"बहुतेक ओव्हरटाईम करावा लागणार!”
“आज माझी वही”…"डेडलाईन पुन्हा उलटून जाणार!”
“आई उद्या शाळेत सोडायला येशील?”…"९.२७ नंतर एकदम ९.५६!”

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे…
तुझं बोट धरून यायचं होतं गं…
तुझ्या स्वप्नांच्या गावाला…
पण मिळत नाही त्याच्यासाठी कॅज्युअल…
मग मी नुसतंच तुझ्या डोक्यावर थोपटत राहिले…
तू लवकर मोठी होण्याची वाट बघत!

आणि एक दिवस खरंच…
झालीस की गं मोठी!
आता मी रोज संध्याकाळी…
दारात उभी असायची तुझी वाट पहात…
तुझ्याशी राहिलेलं सगळं बोलायचं होतं…ऐकायचं होतं!
पण आजही तू निघून गेली होतीस…
तुझ्या स्वप्नांच्या गावाला…
आणि मी राहिले मागेच
तुला निरोपाचे हात हलवत…

आजकाल ऐकते तुला फोनवर…
कधी ई पत्रातून भेटते…
अश्शीच बोलत रहातेस भडाभडा…
तुझ्या बाळाबद्दल, त्याच्या शाळेबद्दल,
डबे, लोकल, डेडलाईन्सबद्दल…
खरं खरं सांगू…
लांब असलीस नां तरी
फार फार जवळ वाटतेस तेव्हा!

पाहते तर योशिदासान करंगळीएवढया, He-manच्या तलवारीसारख्या दिसणा-या स्टीलच्या आयुधाने मला टोचत होत्या. पाहिलं तर आजूबाजूच्या लोकांनीही किमोनोत दडवलेल्या पाकिटातून आपापल्या तलवारी बाहेर काढल्या होत्या. मंडळी ती मिठाई नाजूकपणे तलवारीने कापून, तिलाच टोचून खात होती. हातातोंडाच्या लढाईला आम्ही तलवार वापरत नाही असं त्यांना सांगावसं वाटलं. पण चहा मिळाल्यावर बोलू म्हणून गप्प बसले. पण बाकी काहीही म्हणा मिठाई दिसायला आणि असायला भलती़च ग्वाssड होती.










आम्ही मिठाई खात असतानाच एक तरूण मुलगी खोलीत आली आणि चहा करायला लागली. यंत्राचं बटण दाबावं तशा तिच्या स्लो-मोशनमधे शिस्तबद्ध हालचाली सुरु झाल्या. प्रथम एका लाल सिल्कच्या कापडाची त्रिकोणी घडी करून चहाचे वाडगे आणि पळी पुसली, वाडग्यात मापाने माच्चाची हिरवी पावडर घातली, काळ्या चिनीमातीच्या बोन्साई रांजणातलं गरम पाणी बांबूच्या पळीने त्या वाडग्यात ओतलं आणि लाकडी चासेनने अंडं फेटावं तसाच पण हळुवारपणे चहा फेटला. तयार झालेला चहाचा वाडगा घड्याळाच्या दिशेने तीन वेळा फिरवला आणि बाजूला ठेऊन दिला. त्याबरोब्बर आज्जी उठल्या आणि तो वाडगा घेऊन पाहुण्यांकडे गेल्या. पाहुण्यांनी तो तीन वेळा आपल्याकडे फिरवून घेतला आणि त्या वाडग्यावरची नक्षी पाहून धन्य झाल्यासारखं दाखवलं. बोलक्या काकूंनी सगळ्यांच्या वतीने वाडगा आवडल्याचं सांगितलं. त्याबरोब्बर आज्जीची वाडगा कोण, कुठला, सध्याच्या ऋतूला तो कसा चांगला आहे ह्याविषयीची कॉमेंट्री सुरु झाली. वास्तविक मी जपानमधेच ह्याच्यापेक्षा कित्तीतरी सुंदर वाडगे पाहिले आहेत. त्या काळ्या वाडग्यात एवढं पाहण्यासारखं काय होतं ते त्या झेनलाच ठाऊक! सगळ्यात शेवटी माझ्यापर्यंत चहा पोचला. तो लहान बाळांच्या फॅरेक्स एवढा घट्ट आणि फेसाळ होता. चव कडुलिंबाच्या रसासारखी होती. लहानपणी चहाच्या आधी क्रीमचं बिस्किट खाल्लं की आई “आता चहा काय गोड लागणार!” असं म्हणायची. आणि इथे नेमकं तेच तत्त्व वापरून चहा पद्धतशीरपणे कडू लागवण्यात आला होता. सगळेजण वाडगा तोंडाला लावून सुर्रकन तो घट्ट चहा शोषून घेत होते. एवढी एकच गोष्ट मात्र मला चांगली जमली. चहा पिऊन झाल्यावर आलेल्या हिरव्या मिशा आणि आपापल्या कपाची उष्टावलेली कड ओल्या टिश्यूने पुसून तो वाडगा परत तीन वेळा फिरवून आज्जींकडे परत दिला. चहा करणा-या काकूंनी मग हळूहळू एक एक करून कप विसळले, चहाची भांडी विसळली, पुसली आणि एकदाचे नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही निघायला मोकळे झालो. इथे एका परिच्छेदात आटपलेली सेरेमनी प्रत्यक्षात मात्र तासभर चालू होती. एक तास वज्रासनात बसून पाय जड होऊन दुखण्याच्या पलिकडे गेले होते. आयुष्यात पहिल्यांदाच “चहा नको पण सेरेमनी आवर” असा मी आपल्या देवाचा धावा केला।



चहा पिण्यासारखा साधा आनंद एवढा अगम्य का वाटावा? का तो सोपा झाला तर त्यातली मजा निघून जाईल? टी सेरेमनी करण्यामागे “इचि गो इचि ए” (一期一会) अशी संकल्पना आहे. म्हणजेच आयुष्यातली प्रत्येक गाठभेट ही एकमेवच असल्याने तिचा प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी हा टी सेरेमनीचा खटाटोप. बरोबरच आहे. असा अखंड वज्रासनात बसवून, न बोलता, कडू चहा प्यायला दिला तर ती भेट ही शेवटचीच ठरेल ह्यात काय शंका?

चहाचा मार्ग वगैरे म्हटलं की मला लगेच आठवतो आमचा कॉलेजचा दीक्षित रोड. ’चायला’ ही शिवी न रहाता देणा-याला आणि घेणा-यालाही आनंद वाटावा अशी जागा म्हणजे तो चहावाला. आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची. आमच्या टी. वायच्या वर्गात मोजून नऊ टाळकी होती. तास संपला की चर्चा, मस्करी सगळं फुल्याफुल्यांच्या गाळलेल्या जागा भरून वर्गातून टपरीवर पुढे चालू होई. एकदा तर पावसाळ्यात शेक्सपिअर शिकताना “अत्ता चहा हवा होता बुवा!” असं कुणीतरी म्हणालं तेव्हा कॉलेजच्या आणि टपरीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच तो चहा टपरी ओलांडून वर्गात आला होता. आणि मग तेव्हापासून आम्ही Tea.Y.B.A. म्हणून ओळखले जायला लागलो. तिथे टपरीवर खिदळणे, गाडयांचे हॉर्न, चहावाल्याने पळीने केलेली ठोकठो्क ह्या सगळ्या गदारोळात चर्चा, रोमान्स, भांडणं, मांडवली, अभ्यास हे सगळं व्यवस्थित चालू असायचं. जप्त झालेली आय. डी., प्रेमभंग सारखी चहाच्या कपातली वादळंही चहानेच थंड व्हायची आणि केट्या सुटल्याचे, थापा पचल्याचे आनंदही चहानेच साजरे केले जायचे. दुःखाचा किंवा आनंदाचाही जास्त बाऊ न करता “कटिंग”वरच ठेवायची फिलॉसोफी त्या टपरीवरच्या चहाने शिकवली. मला खात्री आहे की जपानी टी सेरेमनीतसुद्धा नियमांच्या ऐवजी थोडया दिलखुलास गप्पा असत्या तर तो कडू चहाही नक्कीच गोड झाला असता. आणि ह्या एकमेव भेटीनेच पुढल्या भेटीची ओढ लावली असती.

निःशब्दपणे हिरव्या चहाचा एकेक घोट घेताना त्या चहातून आजुबाजूचा निसर्ग आपलाच एक भाग असल्याची सुखद जाणीव झेनला होते। आणि मला चहापत्तीच्या कडवटपणातून, आल्याच्या तिखटपणातून आणि दूधसाखरेच्या गोडव्यातून अगदी जिवलग मित्राला भेटल्याचं, मनसोक्त गप्पा मारल्याचं समाधान मिळतं. कुणाचं सुख कशात असेल हे सांगता येत नाही. पण म्हणतात नां “सर्व देव नमस्कारम्, केशवम् प्रतिगच्छति” तसेच चहाचे कोणतेही मार्ग शेवटी आनंदाच्याच वाटेला जाऊन मिळतात हेच खरं.

जपानविषयी मला अगदी लहानपणापासूनच आपुलकी वाटत आली आहे ती चहामुळे. योगायोगाने इथेही चहाला “चा” असंच म्हणतात. कॉफी ही जरी चहाचीच श्रीमंत घरात दिलेली बहिण असली तरी चहा मात्र पहिल्यापासूनच कांदेपोहे, बटर, केक, भजी, खारी बिस्कुट ह्या सर्वांना जोडणारा; चांदीच्या किटलीत आणि मातीच्या कुल्हडमधेही “ठेविले अनंते” म्हणत सुखेनैव रहाणारा मध्यमवर्गीयच आहे असं मला नेहमी वाटतं. जपानमधे मिळणारे ओचा (green tea), ऊलॉंगटी, मुगीचा, हर्बल टी असे अनेक आचरट प्रकार मी केवळ ते चहा आहेत म्हणून सहन करते. पण अजूनही जगप्रसिद्ध टी सेरेमनी बघण्याचा योग काही आला नव्हता.
एकदा मी तसं योशिदासानना बोलून दाखवलं. योशिदासान म्हणजे जपानमधल्या माझ्या सबकुछ. इतक्या की आई त्यांना “यशोदा” सानच म्हणते. मला स्वतःला त्या छोटया केसांचा, शर्टपॅंट घालणारा, मेकअप करणारा देवच आहेत की काय असं वाटतं. कारण मी त्यांना काहीही म्हटलं की त्या तथास्तु म्हणून इच्छा लगेच पूर्ण करतात. त्यातून टी सेरेमनी म्हणजे योशिदासानचं होमपिच. बारा गावचं पाणी प्यावं तसा त्यांनी बाराशे सेरेमनीचा चहा प्यायला असेल. त्यामुळे लगेचच पुढच्या वीकांताला जपानी टी सेरेमनी पहायला त्या मला घेऊन गेल्या.
त्यादिवशी बसलेल्या धक्क्यांची सुरुवात योशिदासानला भेटल्या क्षणापासून झाली. आपली "मेहेबूबा मेहेबूबा" वाली हेलन जर अंगभर साडी, खांद्यावर पदर, आंबाडयात गजरा, कपाळावर कुंकू अशा अवतारात उभी राहिली तर साक्षात सलमानसुद्धा जसा तिला ओळखणार नाही तसं मी त्यांना ओळखलंच नाही. गुलाबी रंगाचा चेरीच्या पाकळयांचं डिझाइन असलेला किमोनो, त्यावर जांभळ्या रंगाचा चापूनचोपून बसवलेला दप्तरासारखा ओबी, त्यांच्या गोल चेह-याच्या परिघावर शिस्तीत बसलेले केस, आणि चेह-यावर पडलेलं किमोनोचं गुलाबी प्रतिबिंब…फेब्रुवारीतच पाहिला की मी वसंत!
टी सेरेमनीचं स्पेलिंग सोडल्यास आमची पाटी कोरी होती. त्यामुळे गाडीतून जाताना योशिदासानी 'धावतं'वर्णन केलं. एरवी जपानात जो हिरवा “ओचा” पितात त्याहून अधिक पौष्टिक “माच्चा” नावाचा चहा टी सेरेमनीला पितात. चहाला जमलेल्या मंडळींच्या सम्मेलनाला “चाजी” किंवा “ओचाकाई” असं म्हणतात तर प्रत्यक्षात चहा करण्याच्या कलेला “सादो” (茶道) असं म्हणतात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे 'चहा'आणि 'मार्ग'असा आहे. चहा पिण्यातून जे पावित्र्य, साधेपणा, शांतता मिळते तोच जगण्याचा मार्ग आहे असं कदाचित ह्यातून झेन धर्माला सांगायचं असावं. आपण जसा चहा करतो, टाकतो किंवा ठेवतो तसंच जपानीत “ओचा तातेरु” (お茶 立てる) असं म्हणतात. ’'तातेरु' म्हणजे 'उभा करणे'. यजमानांनी उभा केलेला चहा पाहुण्यांनी वज्रासनात बसून प्यायचा की झाली टी सेरेमनी! हाय काय आणि नाय काय!
पण प्रत्यक्षात चहाचा मार्ग भलताच वळणादार होता. ही टी सेरेमनी आतापर्यंत फक्त गुळगुळीत मासिकातच पाहिलेल्या भव्य हॉटेलच्या एका हॉलमधे होती. त्या झुळझुळीत सिल्कच्या जगात आमचं कॉटन उगीचच लक्ष वेधून घेत होतं. आत शिरलो तर दारातंच घोळका करून लोक काहीतरी पहात होते. बघितलं तर एका कागदावर ब्रशने एक मोठ्ठं शून्य काढलेलं होतं. आणि ते बघून सगळे “सुगोई (सही)” “उत्सुकुशिइ (सुंदर)” असं म्हणत होती. “अरे हे तर नुसतंच शून्य आहे!” नागडया राजाच्या गोष्टीतल्या लहान मुलाच्या निरागसतेने मी म्ह्टलं. तर आजूबाजूच्या बायका फिस्सकन हसल्या. आणि योशिदासाननी माझ्याकडे “म्हणून मी तुला कुठे नेत नाही!” असं बघितलं. दहा डिक्शन-या सरसावल्या पण कुणालाही अर्थ सांगता आला नाही. चहा हे जपान्यांसाठी निसर्गाशी किंवा स्वतःशीच तादात्म पावण्याचं एक साधन आहे. टी सेरेमनीतून मिळणा-या पूर्णत्वाचं शून्य हे प्रतीक असावं असा मी अंदाज केला।












ते चित्र धरून त्या खोलीत तातामी चटया, चहाचं सामान, एका कोप-यात अगम्य जपानी कॅलिग्राफीमधे लिहिलेला तक्ता, एक आजी आणि शांतता एवढंच होतं.त्या आजीनी सगळ्या पाहुण्यांना बसायला सांगितलं. बसण्याची जागा मनाप्रमाणे नव्हे तर मानाप्रमाणे ठरवली जाते. त्यामुळे मी इतर सगळे बसल्यावर वज्रासनात बसले. आणि सेरेमनी सुरु झाली.












काय मजा आहे बघा! आपल्याकडचा गप्पिष्ट चहा जपानात जाऊन एकदम गप्पगप्प होतो इथे यजमानांच्या वतीने त्या आजी आणि पाहुण्यांच्या वतीने आमच्यातल्याच एक अनुभवी काकू एवढी दोनच माणसं एकमेकांशी बोलत होती. गप्पादेखील आभारप्रदर्शन, हवापाणी आणि चहा ह्याच्या पलिकडे जात नव्हत्या. बाकीचे लोक गंभीर चेहरा करून माना डोलवत होते. चहाचा पत्ताच नव्हता.
एवढयात खोलीचा दरवाजा उघडला आणि बदामी हलव्यासारखी दिसणारी गुलाबी मिठाई आली. ती खायला जाणार एवढयात...काहीतरी टोचलं…

;;