वाचकांसाठी सूचना: प्रस्तुत लेख हा भावनेच्या भरतीच्या काळात लिहिलेला आहे. त्यामुळे त्या भावना वाचकांच्या अंगावर आदळून वाचक भिजण्याची शक्यता आहे. कृपया रेनकोट घालून लेख वाचावा.

त्यादिवशी खूप दिवसांनी त्याला फोन केला तर त्याच्या कॉलर टयूनमधून नेहमीसारखाच रेहमान भेटला. युवराज चित्रपटातलं मनमोहिनी हे गाणं!

“लट उलझी सुलझा जा बालम…
माथे की बिंदिया बिखर गयी है…
अपने हाथ सजा जा बलमा”

अरेच्चा ही चीज ओळखीची असूनही अनोळखी का बरं वाटते आहे? भीमपलासच्या कोमल ग नी ची जादू असावी का? का रेहमानच्या पॉपचा परिणाम आहे? काही कळत नव्हतं. बसमध्ये, शाळेत, जेवताना सारखं मागे कुठेतरी हेच गाणं वाजत होतं. आणि मग एकदम चमकून गेलं! रेहमानने मूळ चीजेतून चक्क एक ऒळच गाळली आहे!
“लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा!”
मग रेहमानच्या सिंथसाईझरच्या सुरांचं बोट धरून ऍलिससारखी थेट माझ्या लहानपणीच्या वंडरलॅंड्ला जाऊन आले.

पहिल्यांदा आठवला तो व्यास बाईंचा गाण्याचा क्लास. त्याला गाण्याचा क्लास का म्हणायचं हेच आधी मला कळायचं नाही. कारण ते तर एक छान गाणारं घरच होतं. बाबांबरोबर पहिल्यांदा मी तिथे गेले तेव्हा बाहेर हा चपलांचा खच पडला होता. “बाबा, एवढया लोकांसमोर मी काय गाणार? आपण घरी जाऊयात.” असं मी म्हटल्यावर बाबा म्हणाले होते, “ अगं देवळाबाहेर पण ब-याच चपला असतात. म्हणून काय माणसं देवळात जात नाहीत का?” तेव्हापासून आजपर्यंत मला गाणं म्हटलं, ऐकलं, गुणगुणलं की देवळात आल्याचाच भास होतो.

शेवटी हो नाही करत करत आत पाय ठेवला. आजूबाजूला बघण्याची तर हिंमतच होत नव्हती. अलगद जाऊन समोर पाठमो-या बसलेल्या लोकांच्यात गुपचुप मिसळून जावं असं वाटत असतानाच एकदम सगळं शांत झालं. आणि आतापर्यंत दिसणा-या पाठींचे चेहरे होऊन वीसएक डोळे माझ्याकडे बघून लुकलुकायला लागले. तेवढयात लांबून एक आवाज म्हणाला, “ सरगम म्हणून दाखव पाहू!” पेटीच्या सुरात सूर लपवत म्हटलं एकदाचं सरगम. त्याबरोबर तो आवाज बाबांना म्हणाला, “चला आता तुम्ही बाहेर बसा. एका तासाने गाणं संपलं की पुढचं बोलूयात.” अशाप्रकारे फारसं नाट्यमय काहीही न घडता आमच्या गळ्यावर सुरेलपणाचं शिक्कामोर्तब झालं. आणि मग आठवड्यातून दोन दिवस डोक्याबरोबरच गळाही चालता व्हायला लागला.

क्लासमधे अगदी नवीन नवीन असताना मी सगळ्यात मागे, कधीही पळून जाता येईल किंवा चपलांच्या ढिगातून चपला लवकर मिळतील अशा मोक्याच्या ठिकाणी बसायचे. पण एक दिवस पहिल्या फळीतल्या काही लोकांच्या अनुपस्थितीमुळे बाईंनीच मला पुढे बसायला बोलावलं. गृहपाठ, परिक्षा, मार्कं, प्रश्न ही भानगड नसल्यामुळे मीही लगेच पुढे गेले. आणि मग एवढे दिवस लांबून बघितलेला व्यासबाईंचा चेहरा एकदम झूम इन केल्यासारखा जवळ आला. आतापर्यंत बाईंच्या आवाजाशी माझी ओळख होती. पण आता त्यांच्या गालावरच्या खळीशी, मधेच लखकन चमकणा-या खड्याच्या चमकीशी, लता मंगेशकरांसारख्या लांब पण पातळ वेणीशी हळूहळू ओळख व्हायला लागली.

बाईंच्या डाव्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी होती. गाणं शिकवत असताना बाई पेटी तर वाजवतंच पण पेटीच्या भात्यावर अंगठीवाल्या हाताने ताल देत. कुणी बेसूर होत असेल तर पेटीवरचा उजवा हात जोरात चाले आणि बेताल होत असेल तर भात्यावरचा डावा हात जोरजोरात ताल देऊ लागे. आमच्या घरी पेटी आणल्यावर मी बाईंची नक्कल करत तसंच भात्यावर ताल देत एक गाणं वाजवलं तर कुणीतरी म्हणालं, “व्वा! पेटीवर तबला चांगला वाजवतेस तू!”

मग एक दिवस बिहागातली ही चीज शिकले. बिहाग शिकले तेव्हा त्यातल्या शुद्ध-ती्व्र मध्यमाच्या लपाछपीतून तयार होणारा तरल, अवखळ शृंगार कळण्याचं माझं वय नव्हतं. आता मात्र त्या सुरेल धुक्यामागे लपलेली प्रेयसीची आर्जवं, तगमग अस्पष्ट दिसते आणि शब्दांचं चित्र होतं.
“लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा!”
सोळा शृंगार करून प्रियकराची वाट पहाणारी कुणी यौवना. पण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो मात्र कुठेतरी दूर. मग तिचे मेंदीने भरलेले हात तिच्या मदतीला येतात. ती मनातच त्याला म्हणत्येय, “ह्या बटा बघ नां कशा गुंतून बसल्यात….आणि त्यातच ही बिंदी पण विस्कटली आहे…पण ह्या मेंदीने माझे हात बांधले आहेत रे… आता तूच ये आणि आपल्या हातांनी नीट करून जा”…एवढंच. ह्या चीजेत शृंगारिक असं काहीच नाही. पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या दोन ऒळींच्यामधे फक्त आपलाच असा एक गाव असतो. सूर काय किंवा शब्द काय. ते आपले एखाद्या will-o-the-wisp सारखे आपल्याला फक्त त्या आपल्याच गावात घेऊन जातात एवढंच. म्हणूनच षड्जाला स्पर्श न करता अव्यक्तच रहाणारा “लट उलझी” मधला शृंगार मला खूप आवडतो.

ही चीज ऐकली की आणखी एक आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे मेंदीची. मेंदीचे तयार कोन मिळत नव्हते तेव्हापासून मी मेंदी लावत आलिये. किंबहुना मेंदी प्रत्यक्ष हातांवर लागेपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी एक सोहळा होत्या. हिरव्या भुरभुरीत मेंदीचा रानटी वास, त्यात चहाचं लालभडक आधण मिसळलं जात असताना हळूहळू गडद होत जाणारा तिचा रंग, मऊशार पोत, निलगिरीचा उग्र वास हे सगळं मला काल केल्यासारखं आठवतंय. मला मेंदी लावायची जरी प्रचंड हौस असली तरी ती लावण्याचं कसब मात्र माझ्याकडे नाही. ब-याचदा पुस्तकात पाहून काढायला घेतलेल्या मेंदीची परिणिती वैतागून मेंदी हातांवर फासण्यात होत असे.

मग आमच्या शेजारच्या मारवाडी कुटुंबातल्या बायड्यांना माझी दया येऊन शनिवारी रात्री तिचं काम आटपल्यावर मेंदी लावून देण्याचं आश्वासन देई. मग तो दिवस संपण्याची वाट पहाताना, ती विसरणार तर नाही नां म्हणून तिच्या अवतीभवती घुटमळताना वाटणारी बालसुलभ उत्सुकता, अपेक्षा, आनंद असे अनेक भाव मेंदी म्हटलं की आजही माझ्या मनात दाटून येतात. मेंदी लावताना कोनातून एका तालात झरणा-या, आपसूक एका सुबक आकृतीत पडणा-या ओल्या रेषा पहातंच रहाव्यात असं वाटे. कदाचित माझ्या उनाड स्वभावात नसलेला आखीवरेखीवपणा तात्पुरता का होईना पण मेंदीच्या रेषांतून माझ्या हातात आल्याचं समाधान मला तेव्हा मिळत असावं. माझ्या हातावर मेंदी “पुरे आता” इतकी रंगते. त्यामुळे माझे हात बघून कुणीतरी, “सासरी लाड होणार तुझे” असं थट्टेने म्हणालं होतं. पण मेंदी रंगल्याच्या आनंदापलिकडे दुसरा कसलाच विचार यायला तेव्हा मनात जागाच नव्हती.

आईकडून मुद्दाम मागवलेला मेंदीचा कोन इथे कित्तीतरी दिवस फ्रिजमध्ये तसाच पडून आहे. त्यातली मेंदी कोरडी झाली असली तरी मेंदीशी जोडलेल्या आठवणी मात्र अजून ओल्याच आहेत.
गुलजारच्याच शब्दांत सांगायचं तर…
“इकबार वक्त से लम्हा गिरा कहीं,
वहां दास्तां मिली, लम्हा कही नहीं”
रेमान ने त्याच्या गाण्यातून वगळलेल्या ओळीच्या माझ्यापुरत्या आता आठवणी झाल्या आहेत। मनमोहिनी ऐकताना त्या नसलेल्या ओळीची जागा ह्या आठवणी घेतात आणि गाणं पूर्ण होतं.

6 Comments:

  1. प्रशांत said...
    >>>मनमोहिनी ऐकताना त्या नसलेल्या ओळीची जागा ह्या आठवणी घेतात आणि गाणं पूर्ण होतं.<<<
    वाह! क्या बात है!
    सुरेख!
    भानस said...
    Sai, manogatvar lihilech aahe. Punha ekda tuzya blogvar yevoon vachale. Mast vatale.
    Dk said...
    ओह अब समझ गए उस दिन आप ने क्यों पुछा था.. बहुत बढिया लिखा है :-)
    Asha Joglekar said...
    हाथो में मेरे मेहंदी लगी है, लट उलझी सुलझा जा बालम, पूर्वी कितीदा तरी ऐकलेल हे गाणं आज एकदम नवं होऊनच सामोरं आलं.
    Abhi said...
    Sahich!!

    Pandit Jasraj ne hi hi cheej gayali aahe.

    Lekh khup uttam lihila aahe.

    Thanks,
    Abhijeet
    Gaurav said...
    फारच छान लिहता आपण.मनापासून आवडल लिखाण. हा लेख तर छानच जमलाय.
    रेहमानच्या "भोर भये" वर असाच लेख आपण छान लिहू शकाल अस सुचवास वाटत.

Post a Comment